बौध्द आणि बौद्धेत्तर दलितांचे न्याय्यहक्क संघर्ष करुन मिळविणारी संघटना म्हणून एकोणाविसशे बाहात्तर सालातील २९ मे या दिवशी दलित पँथर नावाची आक्रमक संघटना उदयास आली. आक्रमक मार्गाने आंदोलन, सामाजिक विचारांचे प्रबोधन, सर्वव्यापी लोकहित ही मध्यवर्ती भूमिका दलित पँथर या संघटनेची होती. इथल्या मागास, कष्टकरी, कामगार, भूमीहीन, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, भटक्या जाती जमाती, आदिवासी व इतर तत्सम घटकांना सोबत घेऊन सामाजिक लढा उभारण्यात यशस्वी झालेली मजबूत संघटना म्हणून पँथरची ओळख होती. जात, धर्म, वर्ण विरहित, शोषणमुक्त, सुखी-समृद्ध आणि सुसंस्कृत तसेच विज्ञानवादी, समतावादी समाजनिर्मितीचे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून मार्गक्रमण करीत असलेल्या या चळवळीकडे आकृष्ट होऊन अगदी वयाच्या पंधराव्या वर्षी दलित पँथरच्या माध्यमातून नामांतर लढ्यात सहभागी झालेले पत्रकार प्रा.डॉ.गंगाधर तोगरे आजच्या पत्रकारितेतील संघर्षशील पँथर म्हणून चळवळीचा वारसा पुढे नेत आहेत. त्याच कालखंडात १९७२-७३ च्या जिवघेण्या दूष्काळात जीवनयातनांचे क्लेशदायक अनुभव त्यांच्याही वाट्याला आलेले होते. अशा नाजूक काळात कडुनिंबाच्या झाडाखाली पसरलेल्या निंबोळ्या आणि माळरानावर सापडणाऱ्या शेणाच्या गोवऱ्या वेचणाऱ्या हातांनी दुःख नावाच्या क्रौर्याचे सुखसौंदर्यात रुपांतर करण्याची किमया लीलया साधली आहे. त्यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त हा थोडक्यात मागोवा.
नांदेड जिल्ह्यातील कंधार या ऐतिहासिक नगरीचे यशवंत पत्रकार प्रा.डॉ.गंगाधर तोगरे हे मूळचे लातूर जिल्ह्यातल्या जळकोट या गावचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत झाले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे दोनवेळच्या जेवणाची सोय होऊ शकणाऱ्या आणि जवळच असलेल्या मुखेड तालुक्यातील जांब बु. च्या निती निकेतन विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले. तरीही सुट्टीच्यावेळी आईसोबत रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे लागायचे. अशाही परिस्थितीत शिक्षण सुटले नाही. वडिलांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर अपार श्रद्धा. शिक्षणासाठी वडिलांनी सतत बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला. त्यामुळे पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात प्राचार्य डाॅ.ना.य.डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आणि इथेच डॉ.तोगरे यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी पूर्ण केला होता. जीवनसंघर्षाची जळती झालर अंगावर सजवून ते पदव्युत्तर शिक्षणासाठी औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात दाखल झाले. या काळातही जगण्याचा आणि शिकण्याचा संघर्ष कायम होता. तो रक्तातच भिनलेला होता. निती निकेतनच्या वसतिगृहात असतांनाच चळवळीची बीजे रोवली गेली होती. ही बाब अधोरेखित करणे आवश्यक आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 'मूकनायक' या पाक्षिकाच्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेस प्रारंभ केला होता. त्यांच्या पत्रकारितेला एक मूल्यदृष्टी होती. तत्कालीन सामाजिक तथा सांस्कृतिक व्यवस्थेच्या अपरिहार्यतेतून बाबासाहेबांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात करतांना समाजातील भीषण विषमता, दारिद्रय, दमन-शोषण, सांस्कृतिक अहंकार, कमजोर वर्गावरील अन्याय अत्याचार, मानवी जगण्यातली विसंगती यांना छेद देऊन या अनिष्ट बाबींचे समूळ उच्चाटन करणारी विचारधारा निर्माण करणारी, एक नव्या समाजाची निर्मिती करणारी भूमिका घेतली होती. याच मूल्यधिष्ठीत सर्वहारांच्या कल्याणाची आंबेडकरी पत्रकारिता आणि तिचे बीज डॉ.तोगरे यांच्या लेखणीतून उतरलेले पहावयास मिळते. आंबेडकरी चळवळीचं बाळकडू वडिलांकडूनच प्यायला मिळाल्याने पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचा संघर्ष शाईतून कागदावर लिपीबद्ध झालेला आहे. पत्रकारिता हे क्षेत्र म्हणजे प्रामाणिकता आणि कोणताही अभिनिवेश नसलेली, तटस्थ व व्रतस्थपणे कार्यरत राहणारी समाजशील भूमी आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या पत्रकारितेचे मापदंड अनुकरण करण्याची गरज आहे, असे ते बोलून दाखवतात.
गेली अठरा वर्षे दैनिक लोकमत या वृत्तपत्राच्या माध्यमातून यशस्वीरीत्या ते पत्रकारिता करीत आहेत. ही काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली सजग, अभ्यासू आणि तितकीच व्यासंगी पत्रकारिता आहे. जेव्हा ते एखादी शोध बातमी लिहितात तेव्हा ते संशोधकाप्रमाणे, सामाजिक आशय असलेले वृत्तांकन करतात तेव्हा एखाद्या साहित्यिक किंवा विचारवंताप्रमाणे लिहितात. समाजाचा तळ ढवळून काढीत असतांना तळभारतातल्या माणसांच्या दुःखवेदनेला हळूवार फुंकर घालतांना एका विनयशील कार्यकर्त्याच्या भूमिकेतून ते विचार करतात. स्वतः ते कंधार येथील श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात शारीरिक शिक्षणाचे प्राध्यापक आहेत. म्हणूनच की काय त्यांच्या डोक्यात एक साहित्यिक, विचारवंत, कार्यकर्ता, ज्ञानोपासक सतत खेळत असतो. सामान्य माणसाला, उपेक्षितांना बातमीतून न्याय मिळायला हवा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. महाराष्ट्रातल्या लोककलेच्या माध्यमातून तळहातावर पोट घेऊन जगणाऱ्या कलाकारांच्या जगण्यातील संघर्ष त्यांनी सन २००३ सालांपासून मांडला. श्रीक्ष्रेत्र माळेगाव ता. लोहा येथे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा दरवर्षी भरते. तिथे नामवंत कलाकार आपली कला सादर करण्यासाठी येत असतात. लोककलेला राजाश्रय मिळावा म्हणून आणि तेथील अनेक प्रश्न, मूलभूत सोयीसुविधा यांच्यासह राजकीय अनास्था, मानापमान याबाबतच्या एकूण मानसिकतेचे वाभाडे काढणारी मालिका सन २०१७ पर्यंत चालवली होती. आजही ते कोरोना या विषाणूच्या संसर्गजन्य रोगाबाबत उद्बोधनात्मक बातम्यांची शृंखला चालवित आहेत. यासाठी त्यांना धन्यवादच द्यायला हवेत.
कंधार हे राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक शहर आहे. तेथे राष्ट्रकुट काळातच बांधल्या गेलेला भुईकोट किल्ला आजही दिमाखात उभा आहे. सन १९९९-२००० सालापर्यंत हा ऐतिहासिक वारसा भुईसपाट होण्याची भिती निर्माण झाली होती. तेव्हा या दुर्लक्षित वारशाला प्रतिनिधित्व देण्याचे काम पहिल्यांदा त्यांनीच केले. त्यामुळे या आशयाच्या बातमीसाठी त्यांना सन २००३ साली 'लोकमत शोधवार्ता पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. पुढच्याच वर्षी म्हणजे सन २००४ साली मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या संघर्षाची गौरवगाथा उलगडणाऱ्या कंधार तालुक्यातील कल्हाळीची बातमी जी १७ सप्टेंबर २००३ रोजी दैनिक लोकमतच्या अंकात मराठवाडा पानावर प्रकाशित झाली होती त्या 'मराठवाडी मातीला संघर्षाचा गंध ; एकट्या कल्हाळीने दिले ३६ हुतात्मे' या मथळ्याच्या शोधबातमीला उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून मराठवाडास्तरीय कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता शोधवार्ता पुरस्कार डॉ. तोगरेंना प्रदान करण्यात आला. पहिल्यांदाच ही बातमी मराठवाडा विभागावर घेण्यात आल्याने त्यांना कोण आनंद झाला! याच बातमीसाठी 'लोकमत'कडूनही त्याचवर्षी 'उत्कृष्ट वार्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामुळे प्रा. डॉ. गंगाधर तोगरे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला. ही अत्यंत अभिमानाची बाब होती. परंतु याबाबत त्यांनी कसलाही बडेजावपणा किंवा भपकेबाजपणा दाखविला नाही. पत्रकारिता कमी आणि मिरवणेच जास्त हे त्यांना आवडत नाही. अगदी निस्पृहपणे आपण आपल्या कामाला गती देत राहणे त्यांना जास्त आवडते.
डॉ.तोगरे यांच्या पत्रकारितेचे प्रामाणिकपणा, विश्वसनीयता, वस्तुनिष्ठपणा, सामाजिक बांधिलकी आणि तटस्थता ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या बातमीचा अचूक वेध, खरी आणि विश्वासार्ह माहिती, संशोधक वृत्तीमुळे त्यांच्या वृतलेखनाला दर्जेदारपणा प्राप्त झाला आहे. दैनंदिन घडामोडी, भुईकोट किल्ल्याचे विविध प्रश्न, तालुक्यातील शेती समस्या, यशोगाथा, हवामान, शासकीय लाभांच्या योजना आणि त्यांच्या कार्यवाहीची स्थिती, प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती आदी विषय मोठ्या ताकदीने मांडलेले आम्ही वाचलेले आहेत. वाडीतांड्यावरील सामान्य माणसांच्या सुविधासाठींचा संघर्ष लेखणीतून पेरतांना विविध शासकीय कार्यालयांचा कारभारही प्रसंगी चव्हाट्यावर आणला आहे. राजकीय बातम्यांचे अनेक संदर्भ उलगडत असतांना शहर व तालुक्यातील सामाजिक चळवळी, सांस्कृतिक चळवळीचे अधिष्ठान, आंदोलने, नागरिकांच्या न्याय्य मागण्यांनाही त्यांनी प्राथमिकता दिली आहे. कालौघात गडप झालेल्या अनेक विषयांचे उत्खनन करीत कंधारातील अध्यात्माचा सुगंध इजिप्तच्या विद्यापीठात दरवळत असल्याचा शोध त्यांनीच प्रथम लावला. सिंचन, शिक्षण, कृषी यांच्यासह इतर क्षेत्रातील विविध विषयांना त्यांनी तोंड फोडले आहे. लोकमतमधील संडे हटके, संडे स्टोरी आणि मोटीव्हेशननी त्यांच्या पत्रकारितेचे विशेष गुणधर्म दर्शविले आहेत. इतकेच नव्हे तर मराठवाड्याचा दुष्काळवाडा बनत असतांना त्यांनी केलेले प्रतिनिधित्व, खेळीयाड तथा स्पोर्टस पृष्ठावरील त्यांच्या बातम्या प्रादेशिक मर्यादा ओलांडून पुढे जातात. नवरंगपुऱ्याचे इतिहासकालीन दहन, अटकेपार झेंडा लावणारी लाल कंधारी, पेठवडज येथील मत्स्य शेती, लमाणतांड्यावरील लोकसंस्कृती, निजामाचे 'क'पत्रक, निजाम राजवटीविरोधात झुंजणाऱ्या सोनकांबळे कुटुंबाची उपासमार, नुकत्याच आलेल्या मन्याड नदीत बुडणाऱ्या दोन बालकांना जीवदान देणाऱ्या बालवीर कामेश्वर वाघमारे याच्या बातम्या या आणि इतर तत्सम बातम्या डॉ. तोगरे यांच्या लेखनाचे आणि व्यक्तिमत्वाचेही पैलू उलगडतात.
पत्रकारितेव्यतिरिक्त डॉ.तोगरे यांना वाचन, गायन, खेळ, पोहणे, समाजमनाचा सतत कानोसा घेणे, मार्गदर्शनपर मत नोंदवणे, प्रसंगी इतरांना मदत करणे आदी त्यांचे छंद आहेत. माझ्या कुरुळा या गावी ते एकदा व्याख्यानाला आले होते, त्यावेळी मीच त्यांना भीमगीत गाण्याचा आग्रह धरला होता. आग्रहास्तव त्यांनी ते गायिलेही पण ते वेदनेचेही गीत गातात हे कालांतराने उमजले. त्यांनी आपल्या छंदाची संलग्नता पत्रकारितेशी केव्हाच साधली होती. दीड दशक अखंडपणे कंधारातील हिंदू स्मशानभूमीतच वास्तव्य करुन आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या न.प.कर्मचारी नारायण जोंधळे यांच्या कुटुंबाचा अख्खा प्रवासच बातमीत वर्णिला गेला. या बातमीला तथागत गौतम बुद्ध आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे न्यायसौंदर्य लाभले होते. वास्तविक पहाता त्यांच्या आजपर्यंतच्या अनेक वृत्तांतातही ही तत्वज्ञाने ठळकपणे उमटलेली दिसतात. हा समाजमनाचा कानोसा त्यांनी इतक्या चपखलपणे घेतला की, तो उदगीरच्या पत्रकार संघाकडून 'उत्कृष्ट वार्ता मराठवाडास्तरीय पुरस्कारास' पात्र ठरला. हा पुरस्कार राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री खा. संजय बनसोडे यांचे हस्ते उदगीर येथेच एका शानदार सोहळ्यात यथोचित सन्मानासह प्रदान करण्यात आला. याबरोबरच त्यांना डॉ.शंकरराव चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार(ग्रामीण), पत्रकाररत्न राज्यस्तरीय पुरस्कार आणि लसाकमचा लहुजी साळवे क्रांतीगौरव पुरस्कार आदी पुरस्कार मिळालेले आहेत. लोक हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावतीच मानत असले, तरी हा बहुमान म्हणजे माझ्यासाठी नव्या जबाबदारीची जाणीव आहे असे ते मानतात. इतर पत्रकारिता पुरस्कारांसाठीही त्यांच्या शोधबातम्या पात्रच आहेत. यथावकाश ते पुरस्कार मिळतीलच. परंतु आज पत्रकारितेचे संदर्भ बदलले आहेत. आज तात्काळ आणि लाईव्ह बातम्यांचा काळ आहे. समकाळात काही सन्माननीय अपवाद वगळता मिडियाचे क्षेत्र स्वार्थाने बरबटत चाललेले आहे. या डिजिटल, ई-जमान्यातही प्रिंट मिडियाने आपले स्थान कायम ठेवले आहे. मात्र या क्षेत्राला जे दुफळ्यांचे ग्रहण लागलेले आहे. ते निश्चितच भूषणावह नाही. पत्रकारिता राजकारण करण्याचे क्षेत्र नाही. पण यात ते घुसलेले आहे. आज वर्तमानपत्र हे ग्रामीण भागातील पत्रकारितेवर टिकून आहे. पत्रकारांच्या विविध संघटना या पत्रकारितेला पोषक नाहीत. पत्रकारितेत समाजातील सर्व घटक, त्या़चे प्रश्न हाच केंद्रबिंदू असायला हवा. राजकीय पुढाऱ्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करीत असतांना नाकर्तेपणावरही प्रहार करायलाच हवेत असे त्यांचे प्रांजळ मत आहे. ते अभ्यासू वक्ते आहेत. आणि त्यांचे प्रासंगिक लेखनही अंतर्मुख करणारे असेच आहे. त्यामुळे नव्या पत्रकारांनी अधिकाधिक वाचन करावे. शब्दांचे भांडार हे बातमी उठावदार व समाजमनाचा ठाव घेण्यास उपयुक्त ठरते, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. दुसऱ्यांच्याही बातम्या आपण पत्रकार म्हणून वाचल्या पाहिजेत. आपण यापेक्षाही उत्तम बातमी लिहू शकतो. असा दृढविश्वास वाढीस लागण्यासाठी सतत प्रयत्नरत राहून जनसेवेचे हत्यार अधिक धारदार केले पाहिजे. असा सल्ला ते नवपत्रकारांना देतात. खरोखरच अशी क्षमता आणि प्रगल्भता जर अनेक पत्रकारांतून दिसून आली तर पत्रकारिता हे सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे क्रांतीचे आयुध आहे, हे डॉ. तोगरे यांचे म्हणणे सार्थ ठरेल.
- गंगाधर ढवळे, नांदेड
मो. ९८९०२४७९५३
आदरणीय गंगाधर गुरूजी,
उत्तर द्याहटवाआदरणीय प्रा.डॉ.गंगाधरजी तोगरे सरांबद्दल जे लिहीलात ते अगदी सत्य व यथार्थ आहे.
सरांना वाढदिवसाच्या 🎂🎂🎷🥁💃💃🙏🌹 शुभेच्छा....!